Pages

Friday, 17 October 2014

तुमच्या उद्योगाच्या भविष्याचे सकारात्मक चित्र रंगवा. - Article by कुंदन गुरव

“We can not go back in our past and start new beginning but we can think about, dream about and ultimately envision our own future so that we have a brand new ending."

२०० उद्योजकांच्या समूहासमोर हे वाक्य मी फेकले खरे, पण अर्ध्यापेक्षा अधिक लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव असहमतीदर्शक होता. त्यांच्या असहमतीचे कारण मला माहीत होते. कदाचित त्या कारणामुळेच हा सेमिनार आयोजित केला होता. हे सर्व उद्योजक महाराष्ट्रातील एका नामांकित आणि पंचतारांकित MIDC मधील होते. गेल्या दशकात या MIDC ने अतिशय भयावह असे अनुभव घेतले होते. इतले बहुतेक उद्योजक हे एका बलाढय उद्योग समूहासाठी OEM किंवा टियर वन सप्लायर होते. बाजारातील चढ-उतारामुळे या समूहाने Production बंद केल्यात जमा होते. अर्थव्यवस्थेतील मंदी आणि जवळपासच्या छोटया शहरांत झालेल्या विकासामुळे तयार झालेली स्पर्धा.

अशा या परिस्थितीत आजच्या समस्या एवढया मोठया वाटत होत्या की, भविष्याचा विचार करणे अथवा भविष्य घडवणे निरर्थक वाटत असावे. उद्योजक म्हणून कार्य सुरू केले की, प्रत्येकाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागतेच.जेव्हा आजच्या समस्या आभाळाहूनही मोठया असतात. अशा वेळी भविष्याचा विचार अथवा स्वप्न निरर्थक वाटतात खरे, पण याच वेळी भविष्याच्या सकारात्मक चित्राची सर्वात जास्त गरज असते. उद्योजक म्हणून कार्यरत असताना आपण सामोरे जात असणाऱ्या बहुतेक समस्यांचे कारण कुठे न कुठे भविष्याच्या सकारात्मक परिस्थितीचे चित्रण न करण्यातच दडलेले असते यावर माझा आता ठाम विश्वास बसला आहे.

असाच एक सेमिनार संपवून मी प्रश्नोत्तराच्या तासाला सामोरा जात होतो. त्या उद्योजकांच्या समूहात एक प्रौढ गृहस्थ बसले होते, त्यांनी उभे राहत मला प्रश्न टाकला, ``साहेब, तुम्ही सांगता आहात ते सगळे ऐकायला चांगले वाटते पण तुम्हाला उद्योगातील काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स माहीत नाहीत, सर्वात प्रथम तर आम्हाला चांगले कामगारच मिळत नाहीत, त्याचे काय?``

हा प्रश्न तसा माझ्यासाठी नवीन नव्हता, कारण रोज अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. शांतपणे प्रश्न ऐकल्यावर मी त्यांना विचारले, ``साहेब तुम्ही मला गेले दोन तास ऐकता आहात, मी आजपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केलेली प्रोजेक्टस् ही आपण ऐकलीत, त्यातील काही ब्रॅण्ड आपण स्वत: वापरलेत आणि अनुभवले आहेत, तुम्ही मला चांगल्या कामगारांमध्ये मानता का?`` त्याचे उत्तर हो म्हणून आले. मी म्हटले, ``या दोनशे लोकांसमोर मी आपणास विचारतो मी जर आपल्या कंपनीत सांगाल त्या वेतनावर काम करायला तयार झालो तर आपण मला नोकरी द्याल का?`` थोडया संकोचाने पण ते म्हणाले, ``आनंदाने``. मग मी त्यांना विचारले, ``साहेब. मला सांगा तुमच्याबरोबर काम केल्यावर पाच वर्षांत मी कुठे असेन? माझ्या लाईफ मध्ये असे काय काय घडले असेल?`` उत्तर लगेच आले, ``तुमची प्रगती झाली असेल`` पण या उत्तराची फोड करून सांगा म्हटल्यावर मात्र उत्तर आले नाही.

मी म्हटले, ``साहेब माझे सोडा पण आपली कंपनी पुढच्या पाच वर्षांत कुठे असेल, कशी असेल याचा आराखडा आहे का आपल्याकडे.`` प्रांजळपणे नकारार्थी मान डोलवत साहेब खाली बसले पण बसताना अंतर्मुख होऊन विचारमग्न झाले. साहेबांची माफी मागत मी समूहाशी संवाद चालू ठेवला. चांगल्या कामगारांना हवे असते भविष्य, उद्योजक म्हणा अथवा लीडर म्हणा त्यांना तुमच्याकडून उद्याच्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असतात. ही उत्तरे जर समर्पक द्यायची असतील तर बिजनेस प्लानची गरज पडते पण हा बिजनेस प्लान भविष्याच्या सकारात्मक चित्रावाचून बनूच शकत नाही.

बँकेला देण्यासाठी अथवा अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी का लोक बिजनेस प्लान बनवून घेतात जर हा बिजनेस प्लान भविष्याच्या सकारात्मक चित्रावर आधारित नसेल तर दीर्घ कालावधीमध्ये घातक ठरतो. उद्योजकता या विश्वविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शिकलेल्या काही प्राथमिक धडयांपैकी एक म्हणजे `भविष्याची सकारात्मक प्रतिमा` तयार करण्याची कला. यालाच आजच्या जगात व्हिजन शोधणे अथवा बनवणेही म्हणतात. आज व्हिजन हा शब्द अतिशय सर्रासपणे औद्योगिक जगात वापरला जातो. अनेकांना व्हिजन म्हणजे प्रेरणा देणारे एक वाक्य वाटते तर काहींना कार्यालयात, व्हिजिटिंग कार्डवर अथवा ब्रोशरवर लिहायचे फॅन्सी वाक्य वाटते.

शंभराहूनही अधिक व्हिजन वर्कशॉप केल्यावर आजही हे वर्कशॉप करण्यापूर्वी माझ्या मनात भीती असते. प्रसवाच्या वेळी स्त्रीला होणाऱ्या यातना आणि डॉक्टरांनी घ्यायची काळजी या दोन्हीचा समावेश व्हिजन शोधण्याच्या मोहिमेत असतो. बालकाच्या वाढीतला त्याचा जन्म जितका महत्त्वाचा टप्पा तसाच उद्योगाच्या वाढीत व्हिजनाचा शोध अथवा बनवणे. व्हिजनचे महत्त्व फक्त उद्योगातच नाही तर या जगात प्रत्येक गोष्टीला लागू आहे. व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, देशांच्या आणि उद्योगाच्या प्रगतीमध्ये व्हिजनचा मूलभूत सहभाग आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतात जी व्हिजनचे महत्त्व पटवून देतात.

मराठयांचा इतिहास जर पाहिला तर राजा रामदेवराय यादवापासून ते शिवाजींच्या जन्मापर्यंतचा काळ हा अतिशय हलाखीचा, नामुष्कीचा आणि असह्य होता. राजा आणि प्रजा दोघेही आजच्या समस्यांशीच झुंजत होते. अत्याचार, बलात्कार, लूट आणि अतिरेक या सामान्य गोष्टी झाल्या होत्या. यातून आपली कधी सुटका होऊ शकेल, असे लोकांनाही वाटत नव्हते. लाचारीच जीवन जगावे अथवा आत्महत्या करावी अशा प्रकारचे जगणे होते. हा प्रकार तोपर्यंत चालला जोपर्यंत जिजाऊने भविष्याचे सकारात्मक चित्र शिवाजीच्या मनावर कोरले नाही.

स्वराज्याचे स्वप्न उरी घेऊन महाराजांनी घोडदौड सुरू केली. परिस्थिती काही अचानक बदलली नाही. अनेक जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. प्रत्येक वेळी दंडातील ताकद कामी आली असे नाही, पण एक ताकद कायम साथ देत होती ती म्हणजे स्वराज्याचे व्हिजन. 200 वर्षे गुलामीत राहिलेल्या समाजाला जागरूक करायला, मुजरे करायला सोकावलेल्या मनगटात शौर्याचा संचार घडवायला जर काही कामी आले तर स्वराज्याचे व्हिजन. स्वराज्याच्या व्हिजनच्या जोरावर, तुटपुंज्या साधनांच्या जोरावरही स्वराज्य घडलं. या व्हिजनला प्रत्यक्ष रूप देणारे अमर झाले. जन्म-मरणाचा फेरा चुकला. एक स्वाभिमानी समाज पुन्हा ताठ मानेने उभा राहिला.

जातीयवाद, प्रांतवाद, स्वार्थ आणि गुलामगिरीतील ब्रिटिश काळातील भारताला एकत्रित होऊन लढायला जर कुणी भाग पाडले असेल तर ते स्वातंत्र्याच्या सकारात्मक चित्राने. एकच व्हिजन घेऊन गांधी, सावरकर, भगतसिंग आणि सुभाष बाबू वेगवेगळया पध्दतीने लढले. असह्य अशा वेदना सहन करूनही लढत राहायची ताकद होती कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अजून काही तरी खूप महत्त्वाचे करायचे बाकी होते. जोपर्यंत व्हिजन डोळयासमोर होते, आजच्या समस्या लहान वाटत होत्या. मार्ग सापडत होते, कोंडी फुटत होती. स्वातंत्र्य मिळाले आणि देशाने नवीन व्हिजन शोधलेच नाही म्हणून पुन्हा वाटचाल लाचारीची, स्वार्थाची, प्रांतवादाची आणि नैराश्याची झाली. पुन्हा व्हिजन शोधण्याची गरज आज देशाला आहे.

आपण म्हणाल यात कॉर्पोरेट चर्चा कुठे आहे? ज्याप्रमाणे अनेक उद्योजक आजच्या समस्यांवर लक्ष केंद्रित असतात व अनेक यत्न करूनही मार्ग सापडत नाही, किंवा जर आणखी प्रगती केली तर माझ्यासमोर येणारी आव्हाने मी कशी पेलणार, असा विचार करत असतील तर त्यांनी वरील दोन्ही उदाहरणांचा सखोल अभ्यास करावा, उत्तर सापडेल व्हिजनच्या शोधातच. व्हिजन या विषयाचा अभ्यास करताना माझा ठाम विश्वास झालाय, आपल्यापैकी प्रत्येक जण व्हिजनने pregnant आहे. या जगात आल्यावर त्या व्हिजनला प्रत्यक्ष रूप देणे हाच मुक्तीचा एकमेव मार्ग.

व्हिजनला प्रत्यक्ष रूप देण्याची संधी ही प्रत्येक उद्योजकाकडे आहे. उद्योजकतेच्या विश्वविद्यालयातील हा आणखी एक महत्त्वाचा धडा. असे अनेक काही धडे आपणासमोर पुढील काही लेखात आणण्याची इच्छा आहे. तोपर्यंत तुमच्या उद्योगाच्या भविष्याचे सकारात्मक चित्र रंगवा.

- कुंदन गुरव .............................


या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546 



उद्योजकता या विश्वविद्यालयातील माझे प्राथमिक धडे. - Article by कुंदन गुरव

स्वतःचा शोध घ्या.

'साहब जमीन आप के कंपनी के नाम हो गई` रजिस्ट्रारने कागदावर मोहर लावत सांगितले. माझ्या अंदमान द्वीपसमूहातल्या प्रोजेक्टसाठी १५ एकर जमिनीचं खरेदीपत्र आज झालं. या जमिनीत हर्बल प्लांटेशनच्या प्रोजेक्टची सगळी तयारी पूर्ण झाली. साईट ऑफिसमधून समुद्रकिनारा दिसतो, समुद्राकडे पाहत असताना आजपासून १५ वर्षांपूर्वी आमच्या कोकणातल्या घरात झालेला एक संवाद आठवतो, पाहा काही साम्य आढळतंय का?

`मी व्यापार करणार` असं म्हटल्यावर आमचे काका धाडदिशी उभे राहिले आणि अक्षरश: ओरडलेच, `आपला विटांचा कारखाना होता, गावातली जमीन विकावी लागली, आता तुम्ही व्यापार करा म्हणजे राहतं घरही जाईल. हा असा संवाद मराठी माणसासाठी काही नवीन नाही.` भली नोकरी करावी, गाठीला काही पैसे जमवावेत, कुठे एखादी एफडी करावी, जमल्यास गावी एखादं छोटेखानी घर बांधावं आणि निवांत जीवन जगावं हे अगदी सोपं आणि साध जीवनाचं गणित आपण शिकलो आणि शिकवत आलो.

आमच्या व्यापाराची पहिली पाच वर्षे अतिशय कठीण होती. आमच्या काकांची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. इलेक्ट्रॉनिक्स रिपेरिंगपासून कुरीअर कंपनीपर्यंत बरेच व्यापार पाच वर्षांत करून पाहिले. प्रत्येक वेळी बॅलन्सशीटला तोटाच आला.

३१ डिसेंबर १९९९ च्या रात्री सगळं जग नवीन शताब्दीच्या स्वागताला सज्ज झालं होतं, मी मात्र माझ्या कुर्ल्याच्या घरात माळयावर एकटाच बसलो होतो, बसलो होतो म्हणण्याऐवजी लपलो होतो म्हणायला हरकत नाही. व्यापार बुडीत निघाला होता, नवीन व्यापार म्हटला तर भांडवल उरलं नव्हतं, पतही गमावून बसलो होतो. नोकरी करण्याचा मार्ग तेवढा अजून खुला होता. मनाचा निर्धार होत होता नोकरीच करावी, सगळं कर्ज हळूहळू फेडावं, चारचौघांसारखं सरळ जीवन जगावं, अजून किती वणवण करायची, आणि एवढी मेहनत करून पदरी काय तर कर्ज, नामुष्की आणि मित्रपरिवाराच्या सहन न होणाऱ्या नजरा.

माझे बहुतेक मित्र नोकरीला लागले होते काहींना तर सरकारी नोकरी लागली होती. बाबांच्या मते ते सेटल झाले होते. विचारांचा नुसता कोलाहल चालला होता, उद्या पहिला बायोडेटा तयार करायचा आणि नोकरीच्या शोधाला लागायचं, असा विचार पक्का झाला.

आतला रक्तबंबाळ झालेला, अगदी हिरमुसलेला उद्योजक शेवटची धडपड करत काहीतरी कुजबुजत होता, `थोडा शांत हो, विचार कर, गेल्या पाच वर्षांचा आढावा घे` माझ्यातल्या उद्योजकाचं शेवटचं एकदा ऐकायचं मी ठरवलं. वही-पेन घेऊन पाच वर्षांतल्या अनुभवांचा जमाखर्च मांडायला बसलो, एक एक वर्ष, प्रत्येक व्यापार, फ्लॅशबॅकप्रमाणे समोर आला. पहिल्यांदाच मी स्वत:ला त्रयस्थाच्या नजरेने पाहत होतो. गवर्ष्ठि, हट्टी, चंचल, लोभी अशी अनेक रूपं माझी मला दिसली, मी असा आहे यावर विश्र्वासच बसेना. माझे अनेक निर्णय कसे आत्मघातकी होते हे लक्षात आलं.

स्वत:तले दोष पाहनू दु:ख होण्याऐवजी आत्मविश्वास वाढत होता, विषण्णता दूर होऊन नवी उमेद दिसत होती. नोकरीचा विचार पळून गेला. मला काय करू नये हे कळंत होतं. त्या रात्री उद्योजकतेच्या काही नैसर्गिक तत्त्वांचा जणू साक्षात्कार झाला. हा साक्षात्कार माझ्यातला मीच घडवत होतो. रात्री युरेका, युरेका ओरडावेसे वाटले. कदाचित आरडलोदेखील असेल. नव्या शतकाच्या जल्लोषात ते इतरांना कळलं नसेल. त्या एका रात्रीतल्या स्वपरिचयाच्या जोरावर आजपर्यंतचा प्रवास सुरू आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर, इंदौर आणि अंदमान येथे बिझनेस कंसल्टिंग, हेल्थ सप्लिमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असे व्यापार चालू आहेत.

अजून स्ट्रगल आहेच पण गहाळ होऊन नोकरीचा विचार मात्र मनात येत नाही. लोकांच्या नजरेत भरावं एवढं यश काही अजून प्राप्त झालं नाही, पण प्रवास चालू आहे, अजूनही काही मित्र सशंक नजरेने पाहतात, वेळ प्रसंगी सल्लाही देतात. आता सवय झालीय.

त्या रात्री मला उमगलेली महत्त्वाची गोष्ट:

अॅक्शन / रिफ्लेक्शनचे तत्त्व

आत्तापर्यंत व्यापारात कृतीला महत्त्व देऊन जे पुढे येईल त्यावर कृती करत जाणं हेच मला माहिती होतं. `केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे` हा समर्थांचा उपदेश संदर्भ समजून न घेताच मी पळत होतो. कृतीनंतरचा परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे की नाही याचा कधी विचारही केला नाही. अपेक्षित परिणामांच्या दिशेने कृती करायची की कृती करून परिणामांची अपेक्षा करायची यातला नंतरचा मार्ग मी नेहमी स्वीकारला. इतर काय करतात आपणही तसंच करू, त्यांना नफा होतो ना मग आपल्यालाही होईल. माझे सुरुवातीचे काही व्यापार तर इतरांचा व्यापार चांगला चाललाय ना आपणही करून पाहू. बाह्य जगात आज काय चालतंय, कशाला जास्त मागणी आहे त्या गोष्टींचा आपण व्यापार करायचा, कुणी म्हटलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरमसाट पैसा आहे. आम्ही दुकान उघडलं, अरे कुरीअरमध्ये जास्त भांडवल लागत नाही आणि एकदा सेट झाला की पैसाच पैसा, की आमची कुरीअर कंपनी सुरू झाली. तब्बल पाच वर्षे बाह्य जगावर लक्ष केंद्रित करून अज्ञानाच्या पायावर व्यापाराची इमारत उभारत होतो, ती थोडी उभी राहायची आणि माझ्या डोळयांसमोर कोसळायची. पुन्हा नवीन प्रयत्न, नवीन कृती, नवीन उयापार हे दृष्टचक्र पाच वर्ष चाललं.

`बहु हिंडता सौख्य होणार नाही। शिणावे परी नातुडे हित काही।।विचार बरे अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवी वस्ती कीजे।`

त्या रात्री समर्थांचा हा श्लोक डोळयासमोर चमकला. या श्लोकाचा कुणी कसा अर्थ लावेल हे प्रत्येकाच्या मन:स्थिती, परिस्थिती आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. पण माझ्या त्या परिस्थितीत मला समजलेला अर्थ मला आजपर्यंत मार्गदर्शक ठरला. बाह्य जगाकडे पाहून जीवनाची वाटचाल केल्यास काही प्राप्त होणार नाही. जोपर्यंत स्वत:च्या अंतराचा शोध घेत नाही तोपर्यंत तुझ्या अस्तित्वाचं कारणच कळणार नाही. आता माझी शोधमोहीम सुरू झाली.

नव्या व्यापाराची नव्हे तर मी व्यापार का करावा याची. अंतर्मुख होऊन जेव्हा स्वत:ला एक मूलभूत प्रश्न विचारला तो म्हणजे माझ्या अस्तित्वाचे कारण काय? अनेकांना हा प्रश्न आध्यात्मिक वाटेल, उतारवयात विचारायचा प्रश्न, भौतिकातून अध्यात्माकडे वळताना विचारायचा प्रश्न. अनेकांना हा प्रश्न उतारवयात पडतो कारण त्यांनी हा प्रश्न योग्य वेळी विचारलेला नसतो.

स्वत:ला प्रश्न विचारणं आणि प्रश्न पडणं यात आयुष्य जगणं आणि आयुष्य घडवणं यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे. योग्य वेळी योग्य प्रश्न जर स्वत:ला विचारले नाहीतर आयुष्यात अनेक प्रश्न पडतात. पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देत जगणं म्हणजे आयुष्याला प्रतिउत्तर देत जगणं अशा लोकांबरोबर आयुष्य घडत जातं, हे लोक आयुष्य घडवत नाहीत.

माझ्या वाचनात आलेलं एक खूप महत्त्वाचं वाक्य मला इथे आठवलं `Quality of your life will depend of the quality of questions that you will ask` आणि मग अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली, कोणताही नवा व्यापार सुरू करायचा असताना माझ्यातला जोश काही दिवसांत कमी का होतो? व्यापाराने माझ्या भौतिक गरजा पूर्ण कराव्यात, भरपूर पैसा कमवून द्यावा, प्रसिद्धी द्यावी, मानमरातब द्यावा अशा अपेक्षा ठेवल्यामुळेच काही काळात जोश थंडावतो हे लक्षात आलं. मग अनेक व्यापार गेल्या ५०० वर्षांपासून सुरू आहेत त्यांचे संस्थापक आता या जगात नाहीत तरीही ते व्यापार तेवढ्याच जोशात कसे चालले आहेत? हे आणि असे अनेक प्रश्न डोक्यात फिरू लागले.

मला कळून चुकलं, `तुला जे माहीत आहे तेच तुला माहीत आहे, जे तुला माहीत नाही ते तुला माहीत नाही, जेवढं माहीत करून घेशील तेवढ्याचं पटीने माहीत असलेलं वाढत जाईल. आणि माझा प्रवेश झाला एका अशा विश्वविद्यालयात जिथे पदवीदान सभारंभच नाही. आज दहा वर्षांच्या अभ्यासानंतर मी त्या विश्वविद्यालयाला उद्योजकता म्हणतो. स्वागत आहे तुम्हा सर्वांच या विश्वविद्यालयात.

उद्योजकता या विश्वविद्यालयातील माझे काही प्राथमिक धडे

तुम्ही कुठे आहात (फाइंड मी बटण)

हल्ली आपण GPRS वापरतो किंवा मार्ग शोधण्यासाठी Google Map वापरतो. Google Map मध्ये Find Me किंवा Current Location असं बटण असतं, हे दाबलं की संगणक आपल्याला झूम आऊट करून अंतराळात घेऊन जातो. संपूर्ण जगाचं दर्शन एका नजरेत घडवतो आणि मग हळूहळू झूम इन करत आपण ज्या ठिकाणी आहोत ती जागा नकाशावर दाखवतो. एकदा आपण कुठे आहोत हे कळलं की पुढचा मार्ग शोधणं सोपे होते. व्यापार सुरू करण्यापूर्वी स्वत:चा शोध घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.

स्वत:बद्दलचं अज्ञान व्यापारात घातक ठरू शकतं, व्यापारात फक्त तुमचा पैसा लागलेला नसतो. तुमचा वेळ, तुमचं आणि परिवाराचं भविष्य, तुमच्या सहकाऱ्यांचं करिअर अशा अनेक गोष्टी पणाला लागतात. गमावलेला पैसा पुन्हा कमावता येतो पण या अदृश्य गोष्टी गमावल्या तर परत आणणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे व्यापारात पदार्पण करण्यापूर्वी एक स्वल्पिवराम घेऊन स्वत:चा शोध घेतल्याने तुमच्या उद्योगाचाच नाही तर संपूर्ण भविष्याचा पाया मजबूत होईल. असा पाया ज्यावर कितीही उंच इमारत उभी करू शकाल.

स्वत:चा शोध घेणं म्हणजे स्वत:बद्दलची जागरूकता निर्माण करणं. जागरूकतेला व्यापारी जगात खूप महत्त्व आहे. जागरूकपणे केलेल्या गोष्टी अपेक्षित परिणाम देतात आणि जरी अपेक्षित परिणाम नाही आले तरी त्याची जबाबदारी घेणं सोपं होतं. याउलट अज्ञानाने केलेलं कार्य चुकीचे परिणाम देतात आणि मग दोष कुणाला द्यायचा याच्यावर लक्ष केंद्रित होतं. जबाबदारी न घेता दुसऱ्यावर अथवा परिस्थितीवर दोष टाकला तर सुधारणा काय कराव्यात हे कळत नाही. पुन्हा पुन्हा त्याच चुका होण्याची शक्यता असते.

So press ‘find me’ button today. It will open whole new world of opportunities for you, there are such small, but important lessons in the university with no graduation ceremony.

I will be happy to share more my thoughts. Till then keep discovering yourself.

- कुंदन गुरव .............................

या पोस्ट वर कॉमेंन्टस देऊन तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता. वरील पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की Share करा. तुमचा अभीप्राय तुम्ही मला kundang2@gmail.com वर ईमेल करू शकता किंवा WhatsApp करा 9867627546 या क्रमांकावर.

- कुंदन गुरव / Mobile No : 9867627546